[ कविता ]
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव*
भारत आमची शान आहे
जगात उंच मान आहे .
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
हा माझा अभिमान आहे . ॥ धृ ॥
पंच्याहत्तरी गाठली आहे.
भारत माता नटली आहे.
काही बाबतीत अभिमान तर
काही बाबीत आत्मियता घटली आहे .
महागाईचा जोर आहे
गरिबांना घोर आहे
टाळूवरचे लोणी खाणारा
प्रत्येक जण चोर आहे .
बेकारीची छाया आहे
शिक्षण सारे वाया आहे
नफेखोर उद्योगपतींकडेच
साठली सारी माया आहे
शेतकरी,कामकरी गोत्यात आहे
अनुदान भलत्यांच्या खात्यात आहे.
सरकारी लाभ फक्त त्यालाच
जो नेत्यांच्या नात्यात आहे.
जात धर्म मोठा आहे
देश त्यापुढे थिटा आहे .
दहशत आणि दंगलीत साऱ्या
अनेक पक्षांचा वाटा आहे.
घराणेशाही ही कीड आहे.
वारसांसाठी नेत्यांची भीड आहे.
लोकशाहीतील या राजेशाहीची
जनतेच्या मनात चीड आहे .
बरेच नाही चांगले तसे
सारेच काही वाईट नाही
उंच शिखरावर नसलो तरी
एकदमच काही खाईत नाही .
इथे बुद्धीमत्ता आणि तंत्र आहे .
उद्योगात आधुनिक यंत्र आहे
अंतराळातील भरारी आणि
अध्यात्मिक शांतीचा मंत्र आहे
सबला बनली नारी आहे.
पुरुषा इतकीच भारी आहे.
मुलगा मुलगी एक समान
घोषणा अगदी खरी आहे .
'संस्कृती' एक ठेवा आहे
प्रत्येक खेळात छावा आहे .
वेष भाषा आणि अन्न म्हणजे
विविध मेजवानीचा मेवा आहे .
निसर्ग इथला रम्य आहे.
खरंच स्वर्गाशी साम्य आहे .
पक्षी,प्राणी आणि वन,नद्या
प्रत्येकातच गम्य आहे.
सेना जगात भारी आहे
'घटना' देखील न्यारी आहे.
या दोन्हींच्या हातामध्येच
देश सुरक्षेची दोरी आहे.
उत्साही शहर नि गाव आहे
उत्साही रंक आणि राव आहे
स्वातंत्र्यसेनानींसाठी मनामनात
कृतज्ञतेचा भाव आहे .
भारत आमची शान आहे
जगात उंच मान आहे .
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
हा माझा अभिमान आहे .
हा माझा अभिमान आहे .
*जयवंत जाधव, कोवाड*
*ता.चंदगड जि. कोल्हापूर*
*मो.9403463881*
🙏🇮🇳🇮🇳🇮🇳❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
.
No comments:
Post a Comment