Monday, July 14, 2025

कविता - गडी चंदगडी

(चंदगड तालुका गौरव गीत )
*गडी चंदगडी*

गाजला चंदगड,सजला चंदगड, 
मनात चंदगड, जनात चंदगड
जिल्ह्यात राज्यात देशात जगात 
चंदगड गाजतोय हा  हरघडी 
आम्ही चंदगडी , गडी चंदगडी...           

चंदगडी चंदगडी चंदगडी 
मी चंदगडी चंदगडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी 
आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी   ॥ धृ ॥

चंदगड नगरीत भव्य मंदिर
कलाकुसर आहे किती सुंदर
वसला देव रवळनाथ युगंधर

गर्दहिरवी झाडी भोवताली
कोदाळीस्थित देवी माऊली
भक्तांच्या नवसाला पावली

जागृत दैवत देव वैजनाथ
भक्त जमतो इथे गुणगात
भक्तांच्या डोईवर सदा हात

भजन किर्तनी रममान वारकरी
अध्यात्मिक आम्ही गडी चंदगडी ॥ १ ॥

किटवाड सुंडी धबधबा धवल
स्वप्नवत आहे पाँईट स्वप्नवेल
महाबळेश्वर सिमलाही इथे फेल

ऐतिहासिक कलानिधीगड
स्वराज्यांत गणती गंधर्वगड
राजा महिपाळाचा महिपाळगड

नाव मोठे स्वराज्यात पारगडाचे
वास्तव्य होते इथे शिवरायांचे
वंशज शेलारमामा तानाजीचे


सर्प प्रदर्शनात प्रसिद्ध ढोलगरवाडी
स्वातंत्र्यसेनानी,सैनिक हुतात्मे चंदगडी ॥ २ ॥

पश्चिमपट्टा लाललाल माती
काळी सुपिक जमीन कर्याती
पिकतात धनधान्याचे मोती

तालुक्यात होते वतनदार
हेऱ्याचे सांवत इनामदार
कोवाडकर देसाई सरकार

ज्यांनी त्यांची जमीन कसली
सात बाराला नावे डसली
कुळकायद्याने जनता हसली

उताऱ्यासाठी डायरी केली उघडी
शेतीने समृद्ध आम्ही गडी चंदगडी ॥ ३ ॥

सीमेला खेटली राज्य दोन
शेजारी आहेत जिल्हे तीन
सात तालुके आहेत लागून

कोल्हापूर टाईप खुप बंधारे
धरणे जंगमहट्टी तिलारी जांबरे
कैक ठिकाणी लघु पाटबंधारे

हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी
मार्कंडेय तिलारी नदींचे पाणी
फिरले इथल्या सुपिक रानोरानी

निसर्ग हवापाणी जगात लै भारी
शेतीवाडीत रमतो  गडी चंदगडी ॥ ४॥

टपोरे दाणे भाताच्या तुर्‍यात
ऊस डोलतो कसा कुऱ्यात
असतो एक नंबर उताऱ्यात

वाटाना भुईमूग बिनिस हरभरा
प्रसिद्ध सोले दिडघे नि मसुरा
मिरची गहू मका नाचना साजरा

इथल्या काजूची चव आगळी
पिकली पौष्टीक गोड रताळी
कुठे नारळ कुठे पिकते केळी

आंबे फणस करवंदाची झाडी
रानमेवा चाखतो गडी चंदगडी ॥ ५ ॥

'ओलम','इको'ला खाजगी सवलत
शेतकऱ्यांचाही सहकारी दौलत
तिन्ही कारखाने कसे उभे डौलत

शिनोळी हलकर्णी एमआयडीसी
जुळली नाळ आधुनिक उद्योगाशी
जलविद्युत प्रकल्प तिलारी पायथ्याशी

तेल राईसमील,पोल्ट्री जोरदार
चिकण,काजूफॅक्टरीत रोजगार
आली धवलक्रांती दुधाची धार

विकासात घेतोय आता आघाडी
कष्टकरी उद्योगी  गडी चंदगडी ॥६॥

साहित्यात झाले नाव देशभर
पद्मश्री रणजित देसाई स्वामीकार
सिनेनिर्माता दळवी विजयकुमार

पाडूरंग जाधव,पांडूरंग कुंभार
शंकर हदगल,पारु नाईक,केसरकर 
साबळे,नामदेव कांबळे,चांदेकर

शि तु गावडे,बी एन,हणमंत, के जे
शिवणगेकर,कोकीतकर,खाडे बिर्जे
एकनाथ तात्यांचाही 'ठोकळा' गाजे

नंदकुमार मोरेंचा प्रबंध 'भाषा चंदगडी' 
या कवितेचे कवी जयवंत जाधव चंदगडी ॥ ७ ॥

सुर्यकांत दळवी एक नट थोर
प्रसिद्ध नामदेव निकम शाहीर
विकास 'जलवा' टीव्ही स्टार

इथे मिळते सारे शिक्षण दर्जेदार
घडले क्लासवन अधिकारी फार
खेळाडूही जिद्दी आणि उर्जेदार

वल्लभ नि मनवाडकर राष्ट्रीय विनर
सुरज सिद्धार्थ प्रो कब्बडी स्टार
गोळा फेकीत बेनके किर्तीकुमार

शिवछत्रपती क्रीडा पुरकार पै.नाईक मारुती
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर चंदगडी ॥ ८ ॥

प्रसिद्ध हाफ चड्डी चंदगडी
डोकीस शोभे टर्कीनची घडी
असा रुबाबदार गडी चंदगडी

नऊवारी साडी चंदगडी कास
गोलमोठा कुंकू कपाळी खास
आता नव्या फॅशनची मिजास

आहे मायेचा ओलावा खोल
असते पाहुणचारालाही मोल
चंदगडी भाषेतील प्रेमळ बोल

सुर पश्चिमेला कोकणी, पूर्वेला कानडी
प्रमाण भाषेतही खुलतो गडी चंदगडी ॥ ९ ॥

नाट्य आणि सांस्कृतिक चळवळ
कामगार,भूमीहीनांचीही कळकळ
तरुण रक्तात राजकारण सळसळं

जेष्ठ,तरुण नेत्यांत मोठी धडाडी
कुठे आघाडी,आहे कुठे बिघाडी
कांही प्रामाणिक,कांहीत लबाडी

आमदार झाले व्हीबी, व्ही.के .
नरसिंगराव पाटील नावाचे दोघे
राजेश आणि शिवाजीराव खमके

मंत्री भरमूआण्णांना लाल दिव्याची गाडी
दर्दी राजकारणी आम्ही गडी चंदगडी  ॥ १० ॥

गाजला चंदगड,सजला चंदगड, 
मनात चंदगड, जनात चंदगड
जिल्ह्यात राज्यात देशात जगात 
चंदगड गाजतोय हा हरघडी
                  आम्ही चंदगडी
                  मी गडी चंदगडी
                  आम्ही चंदगडी
                  मी गडी चंदगडी

चंदगडी चंदगडी चंदगडी 
मी चंदगडी चंदगडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी 
आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी   ॥ धृ ॥

 
      ©जयवंत जाधव,कोवाड
      ता.चंदगड जि.कोल्हापूर
      मोबाईल 9403463881

Monday, July 7, 2025

कविता - वारी

वारी

आली चला वारी
गाठूया   पंढरी
भेटूया  मुरारी
           प्रेमरूपी

रंक आणि राव 
चोर आणि साव
सर्वां भक्तीभाव
            भरलेला

गळ्यामध्ये माळ
हातामध्ये टाळ
गंधाने  कपाळ
             सजलेले

भिमा चंद्राकृती
धुवुया  विकृती
सत्याची स्विकृती
             करण्याला

पाहु सारे संत
सावळा अनंत
मिटतील भ्रांत
            मनातील

ऐकू संत उक्ती
वाढो भाव भक्ती
मना मिळो शक्ती 
            सर्वांच्याच....

_____ जयवंत जाधव, कोवाड
           ता चंदगड जि कोल्हापूर
           मोबा. ९४०३४६३८८१
           ता चंदगड जि कोल्हापूर
           मोबा. ९४०३४६३८८१

Sunday, July 6, 2025

कोवाड गावची कविता

कोवाड: 🙏🏼🙏🏼"गाव भक्तीगीत "🙏🏼🙏🏼

*महती कोवाड नगरीची*

घडली ताम्रपर्णीच्या मूशीत l वसली टेकडीच्या कुशीत ll
नेहमी नांदते खुशीत l माझी नगरी कोवाडची ॥१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

ताम्रपर्णीचे पाणी लाल l संथ आहे तिची चाल ll
उजाळले गावचे भाल l कृपा या अमृतजलाची  ॥२ ॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

होती इथे इनामदारी l नांदली बारा बलुतेदारी ll
सुखशांती घरोघरी l नोंद असे इतिहासाची ॥३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पिक भूईमूग.ऊस,भात l चव इथल्या कडधान्यात ll
सुपिकता काळ्या शेतात l आई बळीराजाची ॥४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पूर्वी नदीवर होत्या नावा I मग जुनेधरण बेळगावकडचा दुवा ॥
आता पर्याय पूल नवा | सोय झाली प्रवाशांची ॥५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गायरान आहे तळीमाळ l रंगतात इथे विविध खेळ ll
गुरांसोबत बाळगोपाळ l सावली भीम मंदिराची ॥६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

श्रीरामाचे मंदिर l  देखणे खुप सुंदर ll
त्यावर श्रद्धाही अपार l भोळ्या रामभक्तांची ॥७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

मंदिर मारुती, बसव,कल्लाप्पाचे l जोतिबा,माऊली,विठ्ठलाचे ll
दत्त,सिद्धीविनायकाचे l कृपा दुर्गामाता,लक्ष्मीची ॥८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

सप्ताह हनुमान जयंतीला l पारायण महाशिवरात्रीला ll
उधान भावभक्तीला l गोडी आहे अध्यात्माची ॥९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कलावतीआईं उपासना सुंदर | अनिरुद्धबापूंचा घुमतो गजर ॥
रोज अभंग,भजने मधूर I हरिविठ्ठल भक्तांची ॥१०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥


दसरा, गणपती मोठा सण l नाग,दिवाळीला फराळ छान ll
रामनवमीलाही मान l धमाल इथे उत्सवांची ॥११॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

शिवपुतळ्याचा आम्हा अभिमान l आंबेडकरांचे गुणगान ll
इथे मास्जिदेलाही मान l इथे घृणा जातधर्मभेदाची ॥१२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

साहित्यिकांची ही खाण l 'स्वामी'चे दिल्लीत झाले गुणगान ll
'श्रीमानयोगी'ही महान ll पद्मश्री रणजितदादांची ॥१३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

माधवीताईंची प्रित जिथे जडली l
तिथेच 'नाच ग घुमा'ही घडली ll
नारी शक्तीही किती रडली l वाचून सल वेदनांची ॥१४॥
गातो महती कोवाड नगरीची

गुरुजी पांडूरंग कुंभार l लेखनिक अक्षरही सुंदर ll
साहित्यातही त्यांची भर l असे खुप मोलाची ॥१५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

लेखक जाधव पांडूरंग l गाजली कांदबरी त्यांची 'भोग  ll
वक्तृत्वाचा जुळला योग lअसे जाण लेखणीची ॥१६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कवी बिर्जे रामदास l नवकवितांचा ध्यास ll
कादंबरी आहे खास l लेखिका पारुताईंची ॥१७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गाव आले सिनेमात l आनंद भरला मनात ll
अजूनही अनेकजणात l असे स्मृती भालूची ॥१८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

इथे आल्या मोठ्या विभूती l पावन झाली इथली माती ll
किती सांगू मी किर्ती l माझ्या या गावाची ॥१९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

अभिनेते नाना,निळू फुले । मंत्री,साहित्यिकही आले ll
कुमारगंधर्व,वसंतराव गाऊन गेले l आठवण येते त्या दिवसांची ॥२०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

इथे जूनी नाट्य परंपरा l अभिनयात आहे दरारा ll
लळीतालाही इथे थारा l किर्ती 'आदर्श प्रेक्षकांची'॥२१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

नेहमी सांस्कृतिक रेलचेल l खेळातही केली कमाल ll
असते कलेतही मोठी धमाल l इथल्या तरुणाईची ॥२२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

रणजित देसाई ग्रंथालय l आहे शिवनेरी वाचनालय ll
इथल्या बुद्धीचे खाद्यालय | ही श्रीमंती माझ्या गावाची ॥२३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

चंदगडी बोली गोड I सोबत प्रमाणतेची जोड ॥
नाही तिल कुठे तोड l अशी भाषा अभिमानाची ॥२४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

श्री हनुमान जूनी तालिम l गजबजून गेले नवे जीम ll
पैलवान जसे बलभीम l इथे उपासना शक्तीची  ॥२५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कोवाड बाजारपेठ l आहे नाव लई मोठं ll
दर गुरुवारी बाजारहट l सोय साऱ्या कर्यातीची ॥२६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

प्रसिद्ध इथली पुरीभाजी l पेढे, आम्लेट आणि भज्जी ll
रोज मिळते चायनिज ताजी l रेलचेल नव्या जून्या हॉटेलांची ॥२७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

डेअरी,पतसंस्था आणि बँका l दोन्ही शेतकरी संघांचा डंका ll
मदत मिळते राव आणि रंका l सोबत सेवा सोसायटीची ॥२८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

भव्य आरोग्य केंद्राची सेवा । पोलिस ठाण्याचीही हवा ॥
अनुभव एकदा तरी  घ्यावा | संकटात मदतीची ॥२९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पुढारी इथले सारे कर्तबगार l त्याला धडाडीची आहे धार ll
विकासाची आहे किनार l जाणिव असे कर्तव्याची ॥३०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

ग्रामपंचायत आहे मस्त l जागरुक इथले ग्रामस्थ ll
सदा कामात व्यस्त ll इथे चर्चा विकासाची  ॥ ३१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गावचा आहे मोठा अभिमान l जयवंत जाधव गातो गुणगान ll
ठेऊन लहानमोठ्यांचा मान ll चूकल्यास माफी सर्वांची ॥३२॥
गातो महती कोवाड नगरीची
 ॥धृ॥

        © जयवंत जाधव, कोवाड
        ता.चंदगड, जि. कोल्हापूर
         मोबाईल 9403463881

कविता - वृद्धत्व

वृद्धत्व

हबकून गेलंय मन
थबकून गेलीय बुद्धी
सावरत नाही तोल
नाही पहिल्या सारखी शुद्धी

पोखरून गेलंय काळीज
खाकरुन गेलाय गळा
सोसवत नाहीत खरंच
आता वृद्धत्वाच्या झळा

जखडून गेलेत पाय
आखडून गेलेत हात
सोबतीला जमले आता
कफ दमा आणि वात

बिचकून गेलोय मी
दचकून गेलीय ती
हेटाळणीशिवाय आता
काहीच नाही हाती

रिचवत नाहीत शिव्या
नि पचवत नाही अन्न
एकाकीच्या भावनेने 
मन झाले आहे खिन्न

खिदळत ये रे यमा
उधळत तुझा रेडा
उचलून ने आम्हा
नकोच विलंब थोडा

     ©जयवंत जाधव,कोवाड
     ता. चंदगड जि. कोल्हापूर
     मोबाईल 9403463881

कविता - लेक

लेक

खरोखरच लेक माझी
सुंदर एक परी
व्याकूळायचो नसेल ती
एक दिवस जरी

पैंजन पायी चिमूकले
नाद घुमायचा घरी
कासावीस मन व्हायचे
आवाज चुकला तरी

किती खुप गोड बडबड
कधी खुप लाजरी
हसतमुख गोड कळी
फुलायचो साजरी

काल काल तर मजकडे
बालहट्ट रोज करी
आता वागते मोठ्यांसारखी
घेऊन जबाबदारी

कधी मोठी झाली ती
मलाच कळले नाही
बघता बघता उरकेलही
तिची लगीन घाई

फोडाहून तळहाताच्या
जपलो किती तरी
आपले धन दान देतो
कुठल्या परक्या घरी

आठवून मी घायाळ होतो
आसवे गालावरी
माझीच लेक मला परकी
ती जाताच सासरी

           
     जयवंत जाधव कोवाड
     ता . चंदगड जि कोल्हापूर
     मोबाईल9403463881

बालकविता - सोनीची शाळा

बालकविता -सोनीची शाळा
नको नको शाळा ती
नको तिथली गचडी
रोज  रोज  खायाला
तिच  तिच  खिचडी

बाईंची आमच्या त्या
असे सदा वट  वट
रोज रोज धोकंपट्टी
म्हणे करा  पट पट

नुसताच अभ्यास
नसतोच कधी खेळ
जाता  जात नाहीच
माझा शाळेतला वेळ

रोज  तिच  पुस्तके
नि त्याच त्याच वह्या
अभ्यास चुकला म्हणे
आणा पालकांच्या सह्या

तेच  तेच  कारण
नि तिच तिच शिक्षा
तुरुंगवासही  बरा
आमच्या शाळेपेक्षा

त्याच त्याच प्रार्थना
नि त्याच त्याच बाई
मी आजपासून मुळी
शाळेला जाणार नाही

म्हणते सोनी आईला
येऊन लाडात थोडी
तुझ्या सारखी बाईंना
नाही माया,लाडीगोडी

श्री. जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881

बालकविता - आईस्क्रिम

बालकविता
आईस्क्रिम

दोन हातात दोन
आईस्क्रिमचे कोन

किती किती थंडगार
गोड मधूर चवदार

पिस्ता, चॉकलेट फेवर
काजू बदाम त्यावर

किती प्रकार एकेक
तऱ्हेतऱ्हेचे ते शेक

रोज मारतो ताव
रोज वेगळी चव

तोंडात सारे माखतो
मिटक्या मारत चाखतो

जेंव्हा खाऊन संपते
पुन्हा हवेसे वाटते

      जयवंत जाधव, कोवाड
      मोबाईल  9403463881

कविता - मोबाईलचं याड


आला नवा जमाना, आले नवे फॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥धृ॥

वाचन गेले लेखन गेले
अभ्यास झाला डिलिट
रोज एक एक नवीन ॲप
त्यानं डोकं झालंय मॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड    ॥१॥

खेळ नाही अभ्यास नाही
रोज नवा मोबाईलचा गेम
बसुन एकाच जागेवर दोघे
झाले डेऱ्यासारखे जाड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥२॥

हसणे बंद, बोलणे बंद
मैत्रीही विसरली सारी
पूर्वीचे सारे संस्कार जाऊन
चांगली मुले बनली बॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥३॥

मम्मी पप्पांच ऐकून एकदा
जेंव्हा सोडला मोबाईलचा नाद
मित्र, नातलग आनंदासह सारे
झाले पुन्हा कुटुंबात ॲड
सोनूसोनीच गेलं आता मोबाईलचं याड   ॥४॥

बालकविता - सोनी झाली मॅडम

बालकविता _
 सोनी झाली मॅडम

सोनी झाली मॅडम
धरुन बसली खुर्ची
पाहून साऱ्या मुलांच्या
नाकाला झोंबली मिर्ची

चष्मा चढवून नाकावर
गणित शिकवते फळ्यावर
अवघड तिच्या गणिताने
मुलं आली ताळ्यावर

मोठा मोठा तोरा दावून
अभ्यास तपासते पोरांचा
छाडीचा ती मार देते
अगदी अगदी खरंचा

खऱ्या मॅडम येताच वर्गात
मुले तक्रार करता सगळीच
सोनी म्हणे, नाही करणार
पुन्हा मी अशी अगळीक


    जयवंत जाधव, कोवाड
    मोबा.9403463881

कविता - गावाकडचा पोऱ्या

💁🏻‍♂गावाकडचा पोऱ्या💁🏻‍♂

धावत गाठतो वळणी रस्ता
हिंडतो डोंगर आणि दऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

झाडा झुडपात माझी ही शाळा
खेळ विटी दांडू आणि दोऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

खायाला रानातील रानमेवा
कांदा, चटणी नि भाकऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

माहित नाहीच खोटे बोलणे
करत नाही चोऱ्यामाऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

नाही जगत सिनेमासारखे
गोष्टी जगतो खऱ्याखुऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

राबतो मी रोजच शेतावर
हाती  गुरे,बैलांच्या  दोऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥


ऊना पावसात खेळून येतो
वेचून खातो   थंड  गाऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

नाही करत केवळ अभ्यास
सोबत मौजा, खोड्या साऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

       जयवंत जाधव, कोवाड
       ता. चंदगड जि.कोल्हापूर
       मोबाईल ९४०३४६३८८१

Monday, April 10, 2023

लोकशाही रुजलीच नाही

लोकशाही रुजलीच नाही

'भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ' ही निती
 मेंदूपर्यत कुणाच्या पोचलीच नाही.
 घराणेशाहीच्या या भारत देशात
 लोकशाही कधी रुजलीच नाही . ॥धृ॥

        खालचा खाली आणि वरचा वरच
        विषमतेची दरी कधी मुजलीच नाही.
        गीता , कुराण , बायबलच्या गर्दीत
        'घटना' कुणी कधी पुजलीच नाही.
        घराणेशाहीच्या या भारत देशात
        लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ १ ॥

तुडूंब भरल्या तिजोऱ्या तरी
लुटारुंची हाव कधी भागलीच नाही.
खंडणी, लाच घेतांना नेत्यांसह
नोकरशाहीही कधी लाजलीच नाही 
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ २ ॥

       विरोधात असता 'विकासाची बात'
       सत्तेत प्रगती कधी सुचलीच नाही
       विरोधासाठीच  विरोध  केवळ
       चांगल्यासाठी टाळी कधी वाजलीच नाही.
       घराणेशाहीच्या या भारत देशात
       लोकशाही कधी रुजलीच नाही. ॥ ३ ॥

गुलामगिरीचे ढग जमले देशावर 
स्वातंत्र्यात जनता कधी भिजलीच नाही.
खऱ्या लोकशाहीसाठी मतदारांनी
प्रबळ 'मत निती' कधी योजलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही  ॥ ४ ॥


'
              @जयवंत जाधव, कोवाड
              ता.चंदगड जि. कोल्हापूर
              मोबाईल - 9403463881

Friday, September 9, 2022

एक विनंती ( कविता )

✒️🇮🇳✒️🇮🇳✒️🇮🇳✒️

एक विनंती

तुम्हा विचारवंत ,साहित्यिकांना
अजूनही एक मान आहे .
देश व समाजाच्या जडणघडणीत
तुमचं वेगळं स्थान आहे.

तडा जाऊ नये त्याला कधीही
याचे आपल्याला भान हवे.
आपल्यालाच आता पेलायचं आहे
देशापुढील आव्हान नवे.

लेखणी ठरावी 'आपली ताकद'
केवळ ती एक 'कला' नको .
तारक असावी जनतेला ती
कुणासाठीही  'बला' नको .

लोकशाहीला मारक असे
वर्तन तुमचे ठेऊ नका .  
चौथा स्तंभ तुम्हीच तिचा
हे कधीही विसरु नका.  

धन,पुरस्कार,पदासाठी कधी
बळी  कुणाच्या पडू नका. 
तुच्छ लोभापायी कुणासाठी
कर्तव्य आपले  सोडू नका.

कुणा एक पक्ष वा नेत्याचा
'प्रवक्ता' तूम्ही होऊ नका.
एकांगी समर्थन वा विरोधाचा
मक्ता कधी तूम्ही घेऊ नका.

आपल्या नेत्याचे लपवून सारे
फक्त दुसर्‍यांचेच गैर दावू नका.
खरेखोटे साऱ्यांचे बाहेर काढा
तुम्ही कुणाचीच खैर ठेवू नका.

माझा-तुझा असा कधीही
मनात तुमच्या भेद नको.
लोकशाहीतील निष्पक्षतेला
तुमच्याकडून छेद नको.

मी भारतदेश  विनंती करतो,
शब्द माझा मोडू नका .
देशविघातक,भ्रष्ट प्रवृत्तीला
ढिले तुम्ही सोडू नका .
ढिले तुम्ही सोडू नका .

🙏🙏🙏🙏🙏🙏
✒️     जयवंत जाधव, कोवाड
          ता.चंदगड जि. कोल्हापूर
          मोबाईल 9403463881

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
ब्लॉग 
http://jayvantjadhav.blogspot.com/

Sunday, August 14, 2022

कविता - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

[ कविता ]
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव   


भारत आमची शान आहे 
जगात उंच मान आहे . 
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 
हा माझा अभिमान आहे .   ॥ धृ ॥


पंच्याहत्तरी गाठली आहे. 
भारत माता नटली आहे. 
काही बाबतीत अभिमान तर 
काही बाबीत आत्मियता घटली आहे .         


महागाईचा जोर आहे 
गरिबांना घोर आहे 
टाळूवरचे लोणी खाणारा
प्रत्येक जण चोर आहे .  


बेकारीची छाया आहे 
शिक्षण सारे वाया आहे 
नफेखोर उद्योगपतींकडेच  
साठली सारी माया आहे       


शेतकरी,कामकरी गोत्यात आहे  
अनुदान भलत्यांच्या खात्यात आहे. 
सरकारी लाभ फक्त त्यालाच    
जो नेत्यांच्या नात्यात आहे.  
       

जात धर्म मोठा आहे   
देश त्यापुढे थिटा आहे . 
दहशत आणि दंगलीत साऱ्या   
अनेक पक्षांचा वाटा आहे.       


घराणेशाही ही कीड आहे. 
वारसांसाठी नेत्यांची भीड आहे.  
लोकशाहीतील या राजेशाहीची   
जनतेच्या मनात चीड आहे .    


बरेच नाही  चांगले तसे 
सारेच काही वाईट नाही 
उंच शिखरावर नसलो तरी 
एकदमच काही खाईत नाही .     


इथे बुद्धीमत्ता आणि तंत्र आहे . 
उद्योगात आधुनिक यंत्र आहे 
अंतराळातील भरारी आणि 
अध्यात्मिक शांतीचा मंत्र आहे         


सबला बनली नारी आहे. 
पुरुषा इतकीच भारी आहे.  
मुलगा मुलगी एक समान 
घोषणा अगदी खरी आहे .


'संस्कृती' एक ठेवा आहे 
प्रत्येक खेळात छावा आहे . 
वेष भाषा आणि अन्न म्हणजे 
विविध मेजवानीचा मेवा आहे .  

निसर्ग इथला रम्य आहे. 
खरंच स्वर्गाशी साम्य आहे .
पक्षी,प्राणी आणि वन,नद्या 
प्रत्येकातच गम्य आहे.

सेना जगात भारी आहे 
'घटना' देखील न्यारी आहे. 
या दोन्हींच्या हातामध्येच 
देश सुरक्षेची दोरी आहे.

उत्साही शहर नि गाव आहे 
उत्साही रंक आणि राव आहे 
स्वातंत्र्यसेनानींसाठी मनामनात 
कृतज्ञतेचा भाव आहे .

भारत आमची शान आहे 
जगात उंच मान आहे . 
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 
हा माझा अभिमान आहे . 
हा माझा अभिमान आहे .


         जयवंत जाधव, कोवाड
         ता.चंदगड जि. कोल्हापूर
         मो.9403463881

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
.

Sunday, August 22, 2021

जयवंत जाधव पुस्तक परिचय 'कौल' कथा संग्रह

.. रहस्यप्रधान कथासंग्रह : ' कौल '

                             ( परीक्षण : उमेश मोहिते )
                  -----    -----      -----

        मराठी साहित्यविश्वात कवितेखालोखाल मोठया प्रमाणावर लिहिला जाणारा एक सशक्त साहित्यप्रकार म्हणून कथेकडे पाहिले जाते.आज महाराष्ट्राच्या विविध भूप्रदेशामध्ये वास्तव्य असणारे लेखक कथालेखन करीत असून मराठी कथा विविध अंगांनी बहरत आहे,याचीच प्रचिती जयवंत जाधव लिखित ' कौल ' हा लघुकथासंग्रह वाचताना येते.या कथासंग्रहामध्ये एकूण १४ लघुकथा असून या कथांमधून मुख्यतः मध्यमवर्गीय जीवन जाणिवा व्यक्त झाल्या आहेत.ही कथा रहस्यप्रधान असून रंजनपरता तिचे वैशिष्टय आहे. ' कौल ' या पहिल्या शीर्षक कथेत गावच्या लक्ष्मीमातेने उजवा कौल दिल्यामुळे ' धनवान ' झालेला धानबाशेठ भेटतो आणि त्याच्या सत्काराच्या वेळी तो आपल्या श्रीमंतीचे रहस्य सांगताना त्याने स्वतः अमलात आणलेला एक नवा ' विचार ' सांगतो.अर्थात हा त्याचा नवा आचार-विचार समजण्यासाठी प्रत्यक्ष ही कथा वाचणेच इष्ट ठरेल.दीपा,तिचा सैन्यात जवान असलेला पिता अशोक आणि तिची आई चारुशिला यांची एका विचित्र योगा-योगाने घडून आलेल्या परिस्थितीमध्ये कशी दुःखद घुसमट होते,याचे उत्कंठापूर्ण नि रहस्यमय चित्र ' कोंडी ' कथेत प्रकटले आहे.नेपाळच्या सीमावर्ती भागात दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला अशोक महिनाभराने ' जिवंत ' होऊन गावी परत येतो आणि पुढे चारुशिलाच्या घरात जे काही घडते,त्याचे या कथेतील चित्रण वाचकमन अस्वस्थ करुन सोडते.प्रल्हाद आणि त्याची प्रेयसी प्रा.शिरसाट यांच्याविरुद्ध षडयंत्र रचतात आणि प्रा.शिरसाट यांच्याच मोबाईलवरून प्रल्हाद अश्लिल स्वरूपाचे संदेश प्रेयसीला पाठवत राहतो.परिणामतः प्रा.शिरसाट गावात बदनाम होतात,पण स्वच्छ चारित्र्याचे प्रा.शिरसाट या आपत्तीमधून कसे निर्दोष सुटतात आणि या कारस्थानामागील खरा गुन्हेगार कसा पोलीसांच्या जाळ्यात अडकतो,याचे अगदी मनोरंजक वर्णन ' जाळं ' कथेत आहे.केशव आणि सुलभी हे कष्टकरी जोडपं गोव्याच्या पीटर सावकाराच्या शेतीमध्ये काम करीत असताना पीटर सावकाराच्या श्रीमंतीचा मोह सुलभीला होतो आणि ती वाहवत जाते.मात्र शेवटी वाहवत गेलेली सुलभी कशी विनाशापासून वाचते,याचे रसभरीत वर्णन ' मोह ' कथेतून वाचण्यास मिळते,तर भरमू या लोभी नि निर्दयी दीराकडून फसवणूक झालेल्या विधवा लक्ष्मीकाकूची कर्मकहाणी ' देवाचा न्याय ' कथेत आहे. शाळेत नाटकात अभिनय करणाऱ्या शीतलचे आई-वडील दहावी परीक्षेनंतर तिचे लग्न जमवू लागतात,तेव्हा शीतल त्यांचा बेत कसा उधळून लावते,याची रंगतदार कहाणी ' भूमिका ' कथेच्या केन्द्रस्थानी आहे.सासणे सर उन्हाच्या काहिलीत आपल्या दुचाकीवर रस्त्याने पायी चालणाऱ्या वृध्द आजीला घेतात आणि त्यामुळे कसे संकटात अडकतात,हे ' धडा ' कथेत वाचायला भेटते.प्रकाश नि शालन या निपूत्रिक दांपत्याला अनाथ मूल दत्तक घ्यायला लावणाऱ्या डॉ.स्नेहल पाटील यांची बोधपर कहाणी म्हणजे ' अभिषेक ' कथा आहे.' नटसम्राट ' सिनेमा पाहून तात्यासाहेब आणि शामकाका यांची ' पैज ' लागते आणि तात्यासाहेबांवर त्यांचा मुलगा नि सून किती माया करतात,हे पाहण्यासाठी शामकाका तात्यासाहेबांचे खोटे अपहरण घडवून आणतात.यातून काय वास्तव उजेडात येते,हे जाणण्यासाठी ' पैज ' ही उपयुक्त बोध देणारी रहस्यकथाच वाचणे श्रेयस्कर ठरेल.साधे दहावीपर्यंतही शिक्षणही पूर्ण न केलेल्या किसनच्या आयुष्याला योगायोगाने लागलेले वळण चित्रित करणारी ' थाट ' कथा मनोरंजक आहे,तर निराधार वृद्ध शंकरकाका आणि शबानाचाची यांच्यात काहीएक निमित्ताने उत्पन्न झालेले स्नेहबंध कसे धर्मापल्याडचे आहेत,याचे सूचन ' धर्म ' कथेत अगदी कलात्मकतेने आले असून मानवता हाच खरा धर्म आहे,याची साक्ष ही कथा देते.तिसऱ्यांदाही मुलगीच झाली म्हणून मानसिक संतुलन गमावून बसलेल्या गोंद्या नांवाच्या ऊसतोड मजूराची कहाणी  ' सूटका ' कथेत आहे. ' संधी ' कथा जवळच्या मित्राकडून निवेदकास आलेला ए्क विपरीत अनुभव मांडणारी आहे,तर ' उपाय ' या कथेत वृध्द मनोहररावांनी त्यांच्या विधवा सुनेवर आलेल्या संकटामधून तिचा बचाव करण्यासाठी केलेल्या कौशल्याचे आविष्करण आहे.असो...
  ..थोडक्यात जयवंत जाधव यांच्या ' कौल ' कथासंग्रहातून लेखकाने मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे भावविश्व टिपले असून वेगवान कथानक,ओघवती लेखनशैली,सहजसुंदर निवेदन आणि रांगडया कोल्हापूरी बोलीभाषेतील संवादांमुळे ही कथा मनाची पकड घेते.तसेच लेखक कथेत निर्माण केलेली उत्कंठा शेवटापर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे कथा वाचण्यास एकदा सुरुवात केली,की वाचक कथेत नकळतपणे गुरफटत जातो आणि शेवटी रहस्यस्फोट झाला की,वाचकाला एकदम सुखद धक्का बसतो आणि तो स्तिमितही होतो.हेच कथालेखक जयवंत जाधव यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.एकूणात ' कौल ' मधील कथेत काही नवखेपणाच्या खुणा जरी जाणवत असल्या तरी ही करमणूकप्रधान कथा वाचकाचे घटकाभर मनोरंजन तर करतेच पण त्याशिवाय काहीएक उपयुक्त असा बोधही देते,हे नक्की ! ( या दृष्टीने या संग्रहामधील ' मोह ', ' धडा ' आणि ' अभिषेक ' या कथा विशेष महत्त्वाच्या आहेत.) यासाठी लेखक जयवंत जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन  !  !

कथासंग्रह   -   कौल
लेखक.      -   जयवंत जाधव
प्रकाशक.   -   अथर्व प्रकाशन,
                    कोल्हापूर.
                    ( मो.९८५०६९९९११ )
पृष्ठे           -   १८४
मूल्य.        -   ३०० रु.
   ----------------  -----------------

उमेश मोहिते,
चलभाष : ९४०५०७२१५४

Monday, August 2, 2021

कौल कथासंग्रहाचे प्रकाशन ..

पुस्तक परिचय "कौल" कथासंग्रह

सकारात्मक विचारसरणीने ठासून भरलेला कथासंग्रह - कौल
----------------------------------------------‐--------------
परिक्षण - प्रा. बा.स.जठार (गारगोटी)
                9850393996
---------------------------------------------------------
कथासंग्रहाचे नाव - कौल
लेखक-जयवंत जाधव  9403463881
प्रकाशक - अथर्व प्रकाशन, कोल्हापूर*
पृष्ठे - 184
किंमत - ₹ 300
---------------------------------------------------------------
           कोवाड गावचे सुपूत्र *जयवंत जाधव* यांचा *कौल कथासंग्रह* सकारात्मक विचारसरणीने ठासून भरलेला कथासंग्रह आहे. कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा विकास हा राबत्या हातावरच अवलंबून असतो. गावातील मोकळ्या हातांना काम देण्यासाठी समाजदृष्ट्या उलट्या काळजाचा बनलेला धानबा मनातील गुपीत न उलगडता कौलाला बसतो. देवी आणि त्याच्यातील हा गुप्त करार *कौल* कथेला वेगळेपण देणारा कसा ठरतो. हे कथा वाचल्यावरच समजून येते. हल्लीच्या जमान्यात, लेखकाने मांडलेली कल्पना प्रत्यक्षात उतरली तर नक्कीच समाजाचा विकास होईल हे वाचकही समजून घेईल.
                 कृत्रिमतेच्या बुरख्याखाली झाकलेली मानवी मनाची कोंडी काही केल्या सुटत नाही. स्वार्थानं बरबटलेलं मन वेळप्रसंगी कठोर - मृदू बनतं पण शेवटी पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. हे *कोंडी* या कथेतून लेखकाने पटवून दिले आहे. कथेत लेखकाने मांडलेला वेगळा बाज ती वाचून पूर्ण केल्याशिवाय पुस्तक मिटवू देत नाही.  लेखकाच्या याच वैशिष्ट्यामुळे पुस्तकाला वाचनीय बनवलं आहे. स्वार्थापोटी दुस-यांना अडकवण्यासाठी वापरलेलं साधन म्हणजे जाळं होय.  हेच जाळं लेखकाने वाचकांच्याही मनाला कैद करण्यासाठी शब्दरुपी धाग्यांनी विणलेले आहे की काय असे वाटते. *जाळं* ही कथा न्यायव्यवस्थेवरील विश्वास, आरोपीचा पुरावा, सरांचं डळमळीत मन याभोवती फिरती ठेवण्याचं लेखकाचं कसब दिसून येतं.
             *मोह* या कथेत नेमकेपणा आणि वातावरण निर्मिती करत वाचकाला नेमका सार देण्याचं लेखकाचं लेखन वाखाणण्याजोगे आहे. *देवाचा न्याय* या कथेत ग्रामीण समाजातील  भोळीभाबडी लक्ष्मी आणि तिचा बिलंदर, कपटवृत्तीचा दिर या दोघातील घमासान चितारताना मोठ्या आवाजात विरून जाणारा छोटा आवाज मनाला करुणेचा पाझर फोडून जातो. नाटकातील भूमिका वटवत असताना आयुष्याचीही भूमिका चोखपणे वटवणा-या शीतलचा, स्टेजवरचा जोश, उत्साह, कणखरपणा यांचं प्रतिबिंब *भूमिका* या कथेतून वाचायला मिळतं.
               बेरकी म्हातारी, गंडवणारं तिचं पोरगं आणि गंडलेले सर या त्रिकुटाभोवती फिरणारी *धडा* ही कथा, मुलांना शाळेत शिकवणा-या मास्तरलाच धडा शिकवून जाते. ' विश्वास मेला पानिपतच्या लढाईत.' हे एखाद्याच्या तोंडून येणारे वाक्य आता  पावलोपावली जाणवत असल्याचे समजून येते. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी संधी नशिबाचं दार ठोठावत येते. तीच वेळ साधून घेणारा संधीचं सोनं करतो अन्यथा बरबादी ठरलेलीच असते. अशाच धाटणीची *संधी* ही कथा माणसाला विचार करायला लावणारी आहे. मानसिक समाधान देणारी *अभिषेक* ही कथा तर आयुष्याचा खराखुरा चेहरा दाखवणारी *पैज* ही कथा मानवी स्वभावाच्या विरूध्द बाजूंचे प्रतिबिंब दाखवणा-या कथा आहेत. यातील एक कथा आनंदाश्रूंना मोकळीक देते तर दुसरी दुःखाश्रूंना मोकळीक देते.
            अर्धवट शाळा सोडलेला किसन, गोव्याची नोकरी, जेनीचं मुकं प्रेम, पोर्तुगाल सफर, या सा-या घटनांतून वळणावळणांनी पुढे सरकत राहणारी *थाट* ही कथा गावपणात घडलेल्या मनाला आपल्या मातीकडे कशी खेचते याचे वर्णन करताना जमीन आणि आसमान यामधील सेतू बळकट केल्याची साक्ष लेखक वाचकाला देतो. माणसातली माणुसकी शिकवणारी *धर्म* ही कथा  काळजाला भिडणारी आहे. या कथेतील घटना, पात्रे, प्रसंग या सा-यांची गुंफण उत्कृष्टपणे केली असल्याने कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते. *सुटका* आणि *उपाय* या दोन्ही कथा ग्रामीण समाजाचं चित्रण डोळ्यासमोर उभं करणा-या आहेत. 
              विषयाची विविधता, नेमकेपणाची साथ, मनाला भुरळ घालणारी शब्दशैली, साजेसं मुखपृष्ठ यामुळेच सर्वांची मांडणी करत लावलेला कौल वाचकरूपी देव निश्चितपणे अभिप्रायरूपाने लेखकाने देईल यात शंकाच नाही. लेखकाच्या भावी साहित्यप्रवासास शुभेच्या देऊन मी माझा शाब्दिक कौल थांबवतो.       ..                                                   रहस्यप्रधान कथा : ' कौल '
                             ( परीक्षण : उमेश मोहिते )
                  -----    -----      -----
   .. मराठी साहित्यविश्वात कवितेखालोखाल मोठया प्रमाणावर लिहिला जाणारा एक सशक्त साहित्यप्रकार म्हणून कथेकडे पाहिले जाते.आज महाराष्ट्राच्या विविध भूप्रदेशामध्ये वास्तव्य असणारे लेखक कथालेखन करीत असून मराठी कथा विविध अंगांनी बहरत आहे,याचीच प्रचिती जयवंत जाधव लिखित ' कौल ' हा लघुकथासंग्रह वाचताना येते.या कथासंग्रहामध्ये एकूण १४ लघुकथा असून या कथांमधून मुख्यतः मध्यमवर्गीय जीवन जाणिवा व्यक्त झाल्या आहेत.ही कथा रहस्यप्रधान असून रंजनपरता तिचे वैशिष्टय आहे. ' कौल ' या पहिल्या शीर्षक कथेत गावच्या लक्ष्मीमातेने उजवा कौल दिल्यामुळे ' धनवान ' झालेला धानबाशेठ भेटतो आणि त्याच्या सत्काराच्या वेळी तो आपल्या श्रीमंतीचे रहस्य सांगताना त्याने स्वतः अमलात आणलेला एक नवा ' विचार ' सांगतो.अर्थात हा त्याचा नवा आचार-विचार समजण्यासाठी प्रत्यक्ष ही कथा वाचणेच इष्ट ठरेल.दीपा,तिचा सैन्यात जवान असलेला पिता अशोक आणि तिची आई चारुशिला यांची एका विचित्र योगा-योगाने घडून आलेल्या परिस्थितीमध्ये कशी दुःखद घुसमट होते,याचे उत्कंठापूर्ण नि रहस्यमय चित्र ' कोंडी ' कथेत प्रकटले आहे.नेपाळच्या सीमावर्ती भागात दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला अशोक महिनाभराने ' जिवंत ' होऊन गावी परत येतो आणि पुढे चारुशिलाच्या घरात जे काही घडते,त्याचे या कथेतील चित्रण वाचकमन अस्वस्थ करुन सोडते.प्रल्हाद आणि त्याची प्रेयसी प्रा.शिरसाट यांच्याविरुद्ध षडयंत्र रचतात आणि प्रा.शिरसाट यांच्याच मोबाईलवरून प्रल्हाद अश्लिल स्वरूपाचे संदेश प्रेयसीला पाठवत राहतो.परिणामतः प्रा.शिरसाट गावात बदनाम होतात,पण स्वच्छ चारित्र्याचे प्रा.शिरसाट या आपत्तीमधून कसे निर्दोष सुटतात आणि या कारस्थानामागील खरा गुन्हेगार कसा पोलीसांच्या जाळ्यात अडकतो,याचे अगदी मनोरंजक वर्णन ' जाळं ' कथेत आहे.केशव आणि सुलभी हे कष्टकरी जोडपं गोव्याच्या पीटर सावकाराच्या शेतीमध्ये काम करीत असताना पीटर सावकाराच्या श्रीमंतीचा मोह सुलभीला होतो आणि ती वाहवत जाते.मात्र शेवटी वाहवत गेलेली सुलभी कशी विनाशापासून वाचते,याचे रसभरीत वर्णन ' मोह ' कथेतून वाचण्यास मिळते,तर भरमू या लोभी नि निर्दयी दीराकडून फसवणूक झालेल्या विधवा लक्ष्मीकाकूची कर्मकहाणी ' देवाचा न्याय ' कथेत आहे. शाळेत नाटकात अभिनय करणाऱ्या शीतलचे आई-वडील दहावी परीक्षेनंतर तिचे लग्न जमवू लागतात,तेव्हा शीतल त्यांचा बेत कसा उधळून लावते,याची रंगतदार कहाणी ' भूमिका ' कथेच्या केन्द्रस्थानी आहे.सासणे सर उन्हाच्या काहिलीत आपल्या दुचाकीवर रस्त्याने पायी चालणाऱ्या वृध्द आजीला घेतात आणि त्यामुळे कसे संकटात अडकतात,हे ' धडा ' कथेत वाचायला भेटते.प्रकाश नि शालन या निपूत्रिक दांपत्याला अनाथ मूल दत्तक घ्यायला लावणाऱ्या डॉ.स्नेहल पाटील यांची बोधपर कहाणी म्हणजे ' अभिषेक ' कथा आहे.' नटसम्राट ' सिनेमा पाहून तात्यासाहेब आणि शामकाका यांची ' पैज ' लागते आणि तात्यासाहेबांवर त्यांचा मुलगा नि सून किती माया करतात,हे पाहण्यासाठी शामकाका तात्यासाहेबांचे खोटे अपहरण घडवून आणतात.यातून काय वास्तव उजेडात येते,हे जाणण्यासाठी ' पैज ' ही उपयुक्त बोध देणारी रहस्यकथाच वाचणे श्रेयस्कर ठरेल.साधे दहावीपर्यंतही शिक्षणही पूर्ण न केलेल्या किसनच्या आयुष्याला योगायोगाने लागलेले वळण चित्रित करणारी ' थाट ' कथा मनोरंजक आहे,तर निराधार वृद्ध शंकरकाका आणि शबानाचाची यांच्यात काहीएक निमित्ताने उत्पन्न झालेले स्नेहबंध कसे धर्मापल्याडचे आहेत,याचे सूचन ' धर्म ' कथेत अगदी कलात्मकतेने आले असून मानवता हाच खरा धर्म आहे,याची साक्ष ही कथा देते.तिसऱ्यांदाही मुलगीच झाली म्हणून मानसिक संतुलन गमावून बसलेल्या गोंद्या नांवाच्या ऊसतोड मजूराची कहाणी  ' सूटका ' कथेत आहे. ' संधी ' कथा जवळच्या मित्राकडून निवेदकास आलेला ए्क विपरीत अनुभव मांडणारी आहे,तर ' उपाय ' या कथेत वृध्द मनोहररावांनी त्यांच्या विधवा सुनेवर आलेल्या संकटामधून तिचा बचाव करण्यासाठी केलेल्या कौशल्याचे आविष्करण आहे.असो...
  ..थोडक्यात जयवंत जाधव यांच्या ' कौल ' कथासंग्रहातून लेखकाने मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे भावविश्व टिपले असून वेगवान कथानक,ओघवती लेखनशैली,सहजसुंदर निवेदन आणि रांगडया कोल्हापूरी बोलीभाषेतील संवादांमुळे ही कथा मनाची पकड घेते.तसेच लेखक कथेत निर्माण केलेली उत्कंठा शेवटापर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे कथा वाचण्यास एकदा सुरुवात केली,की वाचक कथेत नकळतपणे गुरफटत जातो आणि शेवटी रहस्यस्फोट झाला की,वाचकाला एकदम सुखद धक्का बसतो आणि तो स्तिमितही होतो.हेच कथालेखक जयवंत जाधव यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.एकूणात ' कौल ' मधील कथेत काही नवखेपणाच्या खुणा जरी जाणवत असल्या तरी ही करमणूकप्रधान कथा वाचकाचे घटकाभर मनोरंजन तर करतेच पण त्याशिवाय काहीएक उपयुक्त असा बोधही देते,हे नक्की ! ( या दृष्टीने या संग्रहामधील ' मोह ', ' धडा ' आणि ' अभिषेक ' या कथा विशेष महत्त्वाच्या आहेत.) यासाठी लेखक जयवंत जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन  !  !





कथासंग्रह   -   कौल
लेखक.      -   जयवंत जाधव
प्रकाशक.   -   अथर्व प्रकाशन,
                    कोल्हापूर.
                    ( मो.९८५०६९९९११ )
पृष्ठे           -   १८४
मूल्य.        -   ३०० रु.
   ----------------  -----------------




उमेश मोहिते,
चलभाष : ९४०५०७२१५४

Friday, October 23, 2020

शिक्षक संघटना अधिवेशन व वर्गणी अर्थकारण


 शिक्षक संघटना अधिवेशन आणि अर्थकारण....


महाराष्ट्रात सर्वात मोठी (संख्यावरून ) शासकिय कर्मचारी संघटना बहुतेक "शिक्षक संघटनां" असाव्यात. त्यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक संघटना कार्यरत आहेत. प्रत्येक संघटनांची दर दोन किंवा तीन वर्षानी अधिवेशने होत असतात. त्यातही प्राथमिक शिक्षक संघटनांची अधिवेशने ही दणकेबाज होत असतात. शिक्षकांचे अनेक प्रश्न घेऊन राज्यातील मोठ्या नेत्यांना आमंत्रित करुन मोठया उपस्थितीत अधिवेशन पार पडते.
   प्रत्येक संघटना आपल्या अधिवेशनाला लाख दोन लाख सिकांची उपस्थिती होती असे जाहिर करतात अधिवेानासाठी प्रत्येक शिक्षकी किमान ५०० रुपये वर्गणी गोळा केली जाते.
संघटनांच्या दाव्यापेक्षा कमी म्हणजे किमान १००००० / - (एक लाख ) उपस्थिती धरली तरी ५००००००० / - पाच कोटी रुपये रोख जमा होतात. इतका निधी कार्यकर्ते स्वतःची पदरमोड करून वसुल करतात. त्यासाठी संघटनेच्या निधीमधील रक्कम थोडीही वापरली जात नाही. पुर्णच्या पुर्ण रक्कम राज्य संघटनेच्या हातात जाते.
       अधिवेशनाच्या ठिकाणच्या कार्यक्रमाचा खर्च (मंडप पाच सहा लाख, साउंड सिस्टिम एक लाख व इतर तीन चार लाख धरा )जास्तीत जास्त दहा लाखाच्या वर जात नसेल. कारण संघटनेचे सर्व कायकर्ते स्वतःचा प्रवासखर्च, जेवण, चहापाणी खर्च स्वतःच्या खिशातूनच करत असतो. बर, अधिवेशनाचा हा खर्च तुम्हाला कमी वाटत असेल तर चला डबल करु. म्हणजे वीस लाख झाला असे समजू. तरीही एकुण रक्कमेतील 4 कोटी 8O लाख रुपये उरतात. 
त्याचे काय होते  ????
राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याना संघटनेच्या कामासाठी फक्त प्रवासखर्च 4 कोटी 8O लाख खर्च???बर, त्याचा दिशेबही नसतो.
       संघटना बांधणीचं मुख्य कार्य घडते ते तालुक्या लेवललाच.
तालुक्यात संघटना जीवंत ठेवण्यासाठी किंवा कार्यकर्त्याना कार्यरत ठेवण्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम ठेवावे लागतात स्नेहभोजन आयोजित करावे लागते, मोर्चे, आंदोलने, छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी निवेदने देण्यासाठी प्रवासखर्च असतो. तालुका लेवलच्या अधिवेशनचा खर्च असतो.
असाच खर्च जिल्हा पातळीवर असतो.
म्हणजेच संघटनेसाठी जास्तीत जास्त खर्च येतो तो तालुक्याला. त्यानंतर जिल्ह्याला. पण सारा निधी जातो तो राज्याला... म्हणजे अगदीच विरोधाभास....
म्हणून माझे असे मत आहे की या निधीचे वाटप योग्य नाही. कार्यकर्ता पातळीवर काम करणाऱ्या तालुका व जिल्हा शाखेला यातील वाटा मिळणे आवश्यक आहे. कारण राज्य पातळीवर इतका खर्च नसतो. उलट या इतक्या प्रचंड निधीमुळेच राज्य पातळीवरील नेत्यांत तूतू मीमी होत असते. व या पैशांसाठीच संघटनेमध्ये फुट पडते. त्यामुळे संघटनेच्या फुटीला कारणीभूत ठरणाऱ्या या निधीचे वाटप योग्य प्रमाणात तालुका व जिल्हा संघटनेसाठी व्हावे.जेणेकरून तालुका व जिल्हा लेवलला आर्थिक बळ मिळेल. 
या निधीच्या वाटपाचे प्रमाण खालील प्रमाणे असावे.
एकुण
तालुक्यात जमा झालेल्या एकुण निधीपैकी 
तालुक्याला ७० टक्के
जिल्ह्याला   २० टक्के
राज्याला     १० टक्के

समजा एका संघटनेच्या तालुक्यात पाचशे पावत्या फाडल्या तर एकुण 
२ लाख५० हजार जमा होतात.
त्यातील 
७० टक्के म्हणजे एक लाख ७५ हजार तालुक्याला .....
२० टक्के म्हणजे ५०हजार जिल्ह्याला....
१० टक्के म्हणजे २५ हजार राज्याला.....

तालुक्याला तीन वर्षासाठी एक लाख  ७५ हजार म्हणजे जास्त नव्हेत...

जिल्ह्याला एका तालुक्यातून ५० हजार म्हणजे किमान दहा तालुके धरले तरी एकुण पाच लाख ( ५०००००/-) रुपये जमा होतात. आणि....राज्याला
     राज्याला एका तालुक्यातून २५ हजार म्हणजे एका जिल्ह्यातून २ लाख ५० हजार . असे किमान ३० जिल्ह्यातून ७५००००० / - ( पंच्याहत्तर लाख रुपये ) जमा होतील.
  
राज्याला पंच्याहत्तर लाख, जिल्हाला पाच लाख व तालुक्याला पावणेदोन लाख रुपये निधी उपलब्ध होईल....
आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे असे मला वाटते.
  हा लिखानाचा प्रपंच केवळ एका संघटनेसाठी नाही तर राज्यातील सर्व संघटनांसाठी आहे. कारण मी सर्व संघटना टिकल्या पाहिजे या मताचा आहे .कोणतीही संघटना आपापल्या परिने शिक्षकांसाठीच कार्य करते याची मला जाणिव आहे. संघटनेच्या तालुका लेवलला खर्च करण्यासाठी निधीच नसल्यामुळे तालुका पदाधिकाऱ्याना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते.
  तालुका व जिल्हा लेवलच्या सर्व संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्याना विनंती आहे की निधीच्या अशा वाटपासाठी आग्रही रहावे कारण हे आपल्या हिताचच आहे. आणि कार्यकर्त्यानीही मागील हिशेब दिल्याशिवाय पावती फाडणार नाही अशी भूमिका घ्यावी (हिशेबाची एक PDF बनवली तरी सर्वांपर्यंत सहज पोहोचते. फक्त हिशेब द्यायची मानसिकता हवी ) म्हणून संघटनाच्या शुदधता मोहिमेसाठी अशा वाटपासाठी आग्रही व ठाम रहावे....
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
... सर्व संघटनांतील सर्वांसाठी....

🙏🏼मॅसेज प्रत्येक केंद्रातील ग्रुपवर फॉरवर्ड व्हावा. चिंतन व्हावे.🙏🏼🙏🏼

       जयवंत जाधव, कोवाड
       ता. चंदगड जि. कोल्हापूर
       मोबाईल  9403463881

Saturday, October 10, 2020

कविता - नको ते आहे स्वस्त

नको ते आहे स्वस्त
साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

छेडाछेडी करण्यासाठी लागत नाही पैसा
बलात्काऱ्यांसाठी इथला कायदा ऐसा वैसा
अब्रु लुटती इथे सर्वांसमक्ष रात्री,भरदिवसा
तरी निवांत आहे शासन नि मंत्रीही आहेत मस्त 
खरंच सांगतो इथे अबलांची अब्रु झालीय स्वस्त ..

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

शेतात राबून भार्याच्या,नशिबी फाटका पदर
दलालांच्या हाती धान्य,मुलांचे रिकामे उदर
पड़के घर विसाव्याला, तक्तरे झाली चादर
कर्जापायी जीव दिला तरी शासन आहे सुस्त
खरंच सांगतो,बळीराजाचे इथे मरण झालेय स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

मोठमोठ्याने ठोकायच्या नुसत्या आरोळ्या
भावनेला हात घालूनी भाजून घ्यायच्या पोळ्या
चिंता देशाची नाही नेत्यांना,सैनिक झेलती गोळ्या
कितीतरी जीव हुतात्मे सीमेवर घालता गस्त
खरंच सांगतो इथे सैन्यांचे मरण झालेय स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

         जयवंत जाधव,कोवाड
         ता.चंदगड जि. कोल्हापूर
         मोबा -9403463881

Sunday, September 13, 2020

बालकविता - शाळा कधी सुरु होणार ?

बालकविता

शाळा कधी सुरु होणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ? ॥ धृ ॥
आठवण येते शाळेची
तो आठवतो माझा वर्ग
आठवतात बाई,गुरुजी
दाखवत आम्हा चागला मार्ग
त्यांच्यासोबत शिकायला
पुन्हा कधी मिळणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ?॥१॥
रोज आम्ही गाठत होतो
धावत धावत शाळा
परिपाठाआधी खेळायला
सारे होत होतो गोळा 
गंमतीजमती करायला
पुन्हा कधी मिळणार ? 
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ?॥ २ ॥
रांगेत सारे बसत होतो
होताच परिपाठाची वेळ
प्रार्थना नि समूहगीतात
जुळायचा तालसुरांचा मेळ
बोधकथा पंचाग  सांगायला
पुन्हा कधी मिळणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ? ॥ ३ ॥

शिकत होतो छान पाठ
शिकत होतो व्याख्या सुत्र
धडे कविता गाणी गोष्टी
शिकायचो खेळ आणि चित्र
दुपारच्या सुट्टीत गरम जेवण
पुन्हा कधी मिळणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ?
 ॥४॥
सांस्कृतिक नि क्रीडा स्पर्धांत
करून दाखतवत होतो कमाल
वनभोजन आणि सहलीत
करायचो खुप खुप धमाल
गुरुजी बाई नि मित्रांसोबत
पुन्हा कधी गप्पाटप्पा होणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ? ॥५॥
          जयवंत जाधव, कोवाड
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो .9403463881

कविता - मंदीत संधी

मंदीत संधी

कोरोनाने आली साऱ्यांच्या कामधंद्यात मंदी
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी॥धृ ॥
गावोगावी आणि शहरात
किती लॉकडाऊन झाले
शिल्लक होते ते अन्नधान्य
कामाविना खाऊन झाले
रिकामा खिसा रिकामी मन,ठप्प झाली बुद्धी ॥ १ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
महामारीत या महागाईनेही
आपले वर काढले डोके
अव्वाच्यासव्वा 'लोण्या'साठी
टपले साठेबाज व्यापारी बोके
नडलेल्यांना लूटून, करून घेतली आपली चांदी ॥ २ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
भयभीत पेशंटच्या खिशावर
'पिपासु डॉक्टरांचा'  डल्ला
अवाढव्य बिले आकारून
भरून घेतला आपला गल्ला
'धंदा' सोडून 'सेवा' थोडी देणार तरी कधी ? ॥ ३ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
बऱ्याच नेते अधिकाऱ्यांनी
भ्रष्टाचाराच्या परिसीमा गाठल्या
लाखांच्या  सरकारी योजना
साऱ्या मधल्यामधेच लाटल्या
सरकारी कामकाजात सारी माजली अंधाधुदी ॥४॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
माणूसच(?) माणसासोबत
निर्दय वागतोय किती
निर्जिव कोरोनापेक्षा आता
यांचीच वाटतेय भिती
कधी उतरणार डोळ्यावरून याच्या पैशांची धुंदी? ॥ ५ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥

       जयवंत जाधव, कोवाड
       ता .चंदगड जि कोल्हापूर
       मोबाईल 9403463881